विराट कोहलीची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा   

मुंबई : भारतीय क्रिकेट क्षेत्रातील एक मोठी माहिती समोर आली आहे. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मानंतर दिग्गज फलंदाज विराट कोहलीने देखील कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतो, असे विराट कोहलीने बीसीसीआयला कळवले आहे. मात्र बीसीसीआयने विराट कोहलीला निवृत्तीबाबत फेरविचार करण्यास सांगितले आहे.आगामी इंग्लंडसारखा महत्वाचा दौरा आहे. त्यामुळे निवृत्तीबाबत फेरविचार करावा, अशी विनंती बीसीसीआयने विराट कोहलीला केली आहे. दरम्यान, विराट कोहलीलीने अद्याप निवृत्तीबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.
 
विराट कोहलीने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीत भारताकडून शेवटचा कसोटी सामना खेळला होता. या सिरीजमध्ये विराट कोहलीची कामगिरी निराशाजनक होती. त्याने केवळ पर्थ कसोटीत शतक केले होते. मात्र, त्यानंतर विराट कोहलीच्या बॅटमधून धावा आटल्या होत्या. त्यामुळे बॉर्डर-गावस्कर सिरीजमध्ये ऑस्ट्रेलियाकडून टीम इंडियाचा १-३ असा पराभव झाला होता.
 
विराट कोहलीने जून २०११ मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याने वेस्ट इंडिजच्या संघाविरुद्ध पहिला सामना खेळला होता. विराट कोहलीने आपल्या कसोटी कारकीर्दीत एकूण १२३ कसोटी सामने खेळले आहेत. त्यामध्ये २१० डावांमध्ये विराट कोहलीने ४६.८५ च्या सरासरीने ९२३० धावा केल्या आहेत. यामध्ये ३० शतके आणि ३१ अर्धशतकांचा समावेश आहे.
 
रोहित शर्माचीही कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती- भारतीय क्रिकेट संघाचा दिग्गज सलामीवीर रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून अचानक निवृत्ती घेत सर्वांना आश्चर्यचकित केले होते.क्रिकेटच्या सर्वात मोठ्या फॉरमॅटमध्ये त्याचा अलिकडचा फॉर्म चांगला राहिलेला नाही. कसोटमधून निवृत्ती जाहीर केली असली तरी रोहित एकदिवसीय क्रिकेट खेळत राहील. २०२४ च्या टी-२० विश्वचषकानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहलीने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधूनही निवृत्ती घेतली होती.

Related Articles